मुंबई : कर्करोगाविषयीची अधिक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मीरा रोड येथील ‘वोक्हार्ट हॉस्पिटल’तर्फे रविवारी २३ जुलै रोजी विरार येथील मेवाड भवन येथे कर्करोग जागरूकता शिबिर भरवण्यात आले होते. या शिबिराला ३००हून अधिक नागरिक उपस्थित होते.
या शिबिराला वोक्हार्ट हॉस्पिटलच्या कर्करोगतज्ज्ञ डॉ. उमा डांगी, गॅस्ट्रोएंटरोलॉजी व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. इमरान शेख, तसेच व्हेरिकोज व्हेन्स विषयाचे तज्ज्ञ डॉ. हिमांशू शहा उपस्थित होते.
भारतात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, आधुनिक जीवनशैलीमुळे या रोगाने चांगलेच हातपाय पसरविले आहेत. कर्करोगाचे दोनशेहून अधिक प्रकार आहेत. कर्करोगावर वेळीच उपचार आणि निदान ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे; परंतु भारतामध्ये ७० टक्के नागरिक कर्करोगाच्या तिसऱ्या अथवा चौथ्या टप्पामध्ये उपचार सुरू करतात. या शिबिरात माहिती देताना कर्करोगतज्ज्ञ डॉ. उमा डांगी म्हणाल्या, ‘शरीर शुद्ध ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील पेशींची नियंत्रित वाढ आणि विघटन होणे आवश्यक असते. काही पेशी वृद्ध किंवा खराब होतात आणि त्यांची जागा नवीन पेशी घेतात. परंतु या नवीन पेशींची वाढ विशिष्ट अवयवात असंतुलित आणि अनियमित होते. त्या वेळी त्या अवयवाला कर्करोग झाला आहे, असे समजते. शरीराच्या कोणत्याही भागाला कर्करोग होऊ शकतो आणि इतर भागातही तो पसरू शकतो. कर्करोगाबद्दल दुर्दैवाची गोष्ट अशी, की कर्करोग पहिल्या स्टेजला असेल तर त्याची लक्षात येण्यासारखी लक्षणं फार थोडी आहेत. शरीरावरील अथवा शरीरामध्ये गाठ आणि जखम बरी न होणे, सतत खोकला, तसेच कफातून बाहेर येणारं रक्त, आवाजात बदल होणे, गिळण्यास त्रास होणे, वजन घटणे, भूक न लागणे, रक्त किंवा पांढरा स्राव अंगावरून जाणे, लघवी आणि शौचामध्ये बदल ही कर्करोगाची काही लक्षणं आहेत.’
‘कर्करोग झाला आहे असे कळल्यावर मनुष्य कितीही श्रीमंत असो वा गरीब, त्याच्या पायाखालची जमीन सरकतेच. कारण कर्करोग या आजाराविषयी सामान्य माणसाच्या मनात प्रचंड भीती असते. या भीतीपोटीच अनेकांचे खच्चीकरण होते. मग ते मानसिक, शारीरिक असो वा आर्थिक. म्हणूनच कर्करोगाशी दोन हात करण्यासाठी त्याबद्दलची माहिती रुग्णाकडे अथवा त्याच्या नातेवाईकाकडे असेल तर त्याचा सामना तो योग्य प्रकारे करू शकतो व याच जाणीवेतून आम्ही हे शिबीर भरविले आहे,’ अशी माहिती मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख रवी हिरवाणी यांनी दिली.
नागरिकांना अपघात अथवा आजार झाल्यास कोणते प्राथमिक उपचार करावेत, याविषयी वोक्हार्ट हॉस्पिटलच्या आपत्कालीन मेडिकल टीमने या शिबिरात माहिती दिली. या शिबिराला लायन्स क्लब ऑफ भाईंदर, तसेच नाकोडा मानव फाउंडेशनचे सहकार्य लाभले होते.